परळीकरांनो आता तुम्हीच न्याय द्या- धनंजय मुंडेंची जनतेला साद
परळी : 24 तास अहोरात्र जनतेची सेवा करतो म्हणून पंकजाताई मला राक्षस म्हणून संपवायला निघाल्या आहेत. दुष्काळात पाणी दिले, सुख, दुःखात धावून आलो, 1500 भगिनींचे विवाह केले म्हणून मी राक्षस ठरतो का ? असा सवाल करत परळीकरांनो आता तुम्हीच न्याय द्या, अशी साद परळी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी व मित्र पक्षांचे उमेदवार धनंंजय मुंडे यांनी मतदारांना घातली आहे.
सोमवारी होत असलेल्या विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची विराट सांगता सभा आज शनिवारी परळीच्या मोंढा मैदानावर झाली, त्यावेळी ते बोलत होते. सभेला राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्र पक्षांचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होेते. प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून माझ्याबरोबर असलेल्या माझ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर मी लढतो आहे. या परळीची भिती दिल्लीपर्यंत आहे म्हणूनच पंतप्रधानाला इथे यावे लागले.
महाराजांचा ताईंनी अवमान केला
शहराच्या एका लहाण्या गल्लीत उदयनराजे भोसले महाराजांची सभा घेवून ताईंनी महाराजांचा अवमान केला असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. मी लोकांच्या मनात निर्माण केलेले स्थान यांना संपवता येत नाही म्हणून या भावाला संपवण्याचा घाट पंकजाताईंनी घातला आहे. त्यासाठी स्व.मुंडे साहेबांना त्रास देणार्या मंडळींना एकत्र करून मला स्टेजवर शिव्या दिल्या जातात आणि त्याचा बहिणीला आनंद होत होता, याचे दुःख होते, असे सांगताना धनंजय मुंडे भावनिक झाले होते.
मी राक्षस कसा काय ?
मला संपवण्यासाठी आमच्या ताई जंग-जंग पछाडत आहेत, अडचणीत आल्यावर भाजपचे कार्यकर्ते मला फोन करतात, मी जनतेची कामे करतो, विरोधात असले तरी मी त्यांची कामे करतो, तुमचे पाप तुमच्याजवळ माझे पुण्य देवाजवळ असे म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
कुटुंबियांना त्रास दिला
माझ्या कुटुंबियांना त्रास देण्यासाठी माझ्यासह माझी बहिण, पत्नीवर केसेस केल्या, त्यांना अटक करावी, यासाठी प्रशासनावर दबाव टाकला पण जनता सारे पाहात आहे, मी काम केले म्हणून कोणालाही प्रचाराला बोलवावे लागले नाही, तुमची कोरी पाटी होती म्हणून अमित शहा, नरेंद्र मोदी आणि महाराजांना बोलवावे लागले असा टोला लगावला.
सर्वांसाठी सर्व केले
मी मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाच्या आरक्षणासाठी लढलो, शेतकर्यांच्या कर्जमाफी आणि पीक विम्यासाठी भांडलो, समाजातील एकाही घटकासाठी मी काही केले नाही, असे झाले नाही. त्यामुळेच 24 तारखेला गुलाल आपला आहे, फक्त मतदानाची टक्केवारी वाढवा, एकवेळ संधी द्या इथल्या मातीतील लोकांचे उत्पन्न दुप्पट करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली.
विराट रॅलीने केला विजयावर शिक्कामोर्तब
धनंजय मुंडेंच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज शिवाजी चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून रॅलीचा अभूतपूर्व उत्साहात प्रारंभ झाला. माजी मंत्री पंडीतराव दौंड, जि.प.सदस्य संजय दौंड, वैजनाथ सोळंके यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उघड्या जीपमध्ये त्यांच्यासमवेत होते. मुंगी शिरायलाही जागा उरणार नाही, इतक्या संख्येने जमलेल्या जनतेला आणि परळीच्या व्यापारपेठेतील अभिवादन करीत त्यांनी सभास्थळ गाठले, परळीकरांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. अनेक ठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून, जागोजागी औक्षण करण्यात आले.
परळी विधानसभा मतदारसंघातील वारकर्यांच्या दिंड्यांप्रमाणे गावोगावचे कार्यकर्ते मोठ्या जोशपूर्ण आणि स्वयंस्फूर्तीने रॅलीत सहभागी झाले. या रॅलीने श्री.मुंडे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. शहर धनंजय मुंडे यांच्या जयघोषाने दणाणून गेले.
सभेत कोण काय म्हणाले ?
माजी मंत्री पंडीतराव दौंड- 40 वर्ष परळी उध्दवस्त करणार्यांना घरी बसवून परळीचे वैभव धनंजय मुंडे पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात वाढवतील हे वचन मी देतो.बाबुराव पोटभरे- दलित जनता या निवडणूकीत धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे.
ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे- सरकारला जेरीस आणणार्या धनंजय मुंडेंना विजयी करा.
मिलिंद आव्हाड- वंचित, दीन दलितांसाठी झटणार्या धनंजय मुंडेंना साथ द्या.
कॉ.पी.एस.घाडगे- ही लढाई तुमची-आमची आहे.
तुळशीराम पवार- धनंजय मुंडेंच्या कार्यशैलीमुळे आणि पंकजा मुंडेंच्या मराठा समाजावरील अन्यायामुळे तसेच शिवसंग्रामसोबत केलेल्या दुजाभावामुळे आम्ही राष्ट्रवादीसोबत आलो आहोत.
चंदुलाल बियाणी- धनंजय मुंडे विक्रमी मताधिक्यानी विजयी होतील.
दिलीप जोशी- हजारो बहिणींचे कन्यादान करणार्या धनुभाऊंना विजयी करा.
विनोद जगतकर- दलित चळवळीला जीवंत ठेवण्यासाठी धनंजय मुंडेंना विजयी करा.
सोमनाथअप्पा हालगे- दुष्काळात धनंजय मुंडेंनी पाणी दिले, जनतेची कामे केली म्हणून जनतेनी त्यांना डोक्यावर घेतले आहे.
बाळासाहेब देशमुख- ही निवडणूक आता जनतेनेच हाती घेतली आहे.
माधव ताटे- धनंजय मुंडे पी.एम., सी.एम. सर्वांना पुरून उरणारा नेता आहे.
कॉ.प्रभाकरराव नागरगोजे-माजी खा.गंगाधरअप्पा बुरांडे यांच्यासारखे पुरोगामी नेतृत्व तसेच सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी धनंजय मुंडेंना साथ द्या.
श्रीकांत मांडे- पंकजाताईंचा पराभव अटळ असल्याचे खाजगीत त्यांचे कुटुंबियही मान्य करतात.
विष्णुपंत सोळंके- माजलगावचे पाणी वाण धरणात आणण्याची क्षमता धनंजय मुंडे यांच्यातच आहे.
वैजनाथ सोळंके- धनंजय मुंडेंमध्ये गोपीनाथराव मुंडे दिसतात, मराठा समाजाचे अनेक दिग्गज पवार साहेबांना सोडून जात असताना धनंजय मुंडेंनी सावली सारखी पवार साहेबांना साथ दिली.
डॉ.संतोष मुंडे- अपंग व रूग्णांच्या मदतीला धावून येणार्या नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा.
सौ.राजश्रीताई मुंडे- परिवारापेक्षा जनतेवर जीवापाड प्रेम करणार्या व अहोरात्र लोकसेवेसाठी जीवन अर्पण करणार्या धनंजय मुंडेंना विधानसभेत पाठवा.
यावेळी दत्तात्रय मोरे, माणिक कांबळे, प्रभुआप्पा तोंडारे, वसंत राठोड, शैलेंद्र पोटभरे आदींचीही भाषणे झाली.
काँग्रेस नगरसेवक इस्माईल शेख, शिवाजी गित्ते यांच्यासह अनेकांचा प्रवेश
या सभेत परळीचे काँग्रेसचे नगरसेवक इस्माईल शेख, नंदागौळचे शिवाजी गित्ते, घोडा कौडगाव शिवाजीराव भागोजी करंदीकर, भिलेगाव यशवंत कडबाने, दरडवाडी वसंत देविदास दराडे, शंकर दराडे, राजाभाऊ दराडे, सचिन दराडे, दत्तू दराडे, अशोक दराडे, परसराम दराडे, सुरज मुरकूटे, पप्पु गायकवाड, अभिजीत गायकवाड, दलित नेते बापु गायकवाड, पौळ पिंप्रीचे दत्तात्रय काळे यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
अनेक संघटनांनी दिला पाठींबा
या सभेत धनंजय मुंडे यांना जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था, महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट, यंग मुस्लिम योध्दा संघटना, मौलाना आझाद विचार मंच, मनसेचे मराठवाडा विभागीय संघटक स्वानंद भंडारे, मनसेचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रमोद दहिवाळ, संभाजी ब्रिगेडचे मराठवाडा संघटन दत्तात्रय मोरे, नगरसेवक इस्माईल शेख, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गरड, 12 बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष संतोष इंगळे, राजकीय संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे, कामगार नेते लहुजी साळवे यांच्यासह अनेकांनी पाठींबा जाहीर केला. सभेचे सुत्रसंचलन गोविंद केंद्रे यांनी, प्रास्ताविक तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ यांनी तर शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी आभार मानले.
