Saturday, August 24, 2019

महिला सशक्तीकरणाला नवी उंची देणा-या पंकजाताईंच्या मागे खंबीरपणे उभा रहा- खा. डाॅ. प्रितमताई मुंडे


पोषण, शिक्षणानंतर आता महिला सबलीकरणांवर देणार भर - ना. पंकजाताई मुंडे 

परळी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना सन्मान मिळवून देणा-या विविध योजना राबविल्यामुळे समाजात महिला आज स्वाभिमानाने वावरत आहे. जिल्हयात मुलींचा जन्मदर वाढला, तिचे पोषण आणि शिक्षणही होत आहे, आता खरी गरज आहे तिच्या सबलीकरणाची, त्यामुळे आगामी काळात यावरच भर देण्याचे ध्येय आहे असे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज येथे सांगितले. बेटी बचाओ, बेटी पढाओ बरोबरच 'बेटी बढाओ' चा नारा यावेळी त्यांनी दिला. 
जिल्हाधिकारी कार्यालय व महिला बालविकास विभागाच्या वतीने अक्षता मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बेटी बचाओ, बेटी पढाओ अंतर्गत महिला मेळावा व गुणवंतांच्या सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डाॅ प्रितमताई मुंडे तर प्रमुख पाहूणे म्हणून जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार, महिला आयोगाच्या सदस्या गयाताई कराड, बाल हक्क आयोगाच्या सदस्या डाॅ शालिनी कराड, दीनदयाळ बॅकेच्या अध्यक्षा शरयू हेबाळकर, नगरसेविका उमाताई समशेट्टे, महिला बालविकास अधिकारी चंद्रशेखर केकान आदी यावेळी उपस्थित होत्या. 
प्रारंभी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी पुढे बोलतांना ना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, बेटी बचाव आणि बेटी पढाव हे नेमके काय आहे? तसेच याची सुरुवात का झाली तर, माझ्या परळीची चुकीच्या कारणामुळे चर्चा झाली ती म्हणजे स्त्री भ्रूण हत्या आणि हा कलंक पुसून काढण्यासाठी मी निर्णय घेतला आणि तेव्हापासून आम्ही सुरुवात केली. मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी 'लेक वाचवा, राष्ट्र वाचवा' आंदोलन उभारले  आणि त्याचबरोबर 'माझी कन्या भाग्यश्री' ही योजना राबवण्यास सुरुवात केली.
मुलीचा जन्म नाकारण्याची जी मानसिकता होती ती या योजनेमुळे कमी झाली आहे. आज जिल्हयात मुलींचा जन्मदर एक हजार मुलांमागे ९३७ मुली एवढा झाला, ही निश्चितच भूषणावह बाब आहे.
संरक्षण, सबलीकरणांवर भर 
पूर्वीपासूनच महिला हया फार बलशाली होत्या आणि त्या पुरुषांपेक्षाही वरचढ होत्या आणि या कारणामुळेच त्यांना मागे ठेवण्याचे काम झाले.  स्त्रियांना कमी लेखण्याच्या या सगळ्या रूढी पुसत काढण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या सर्व योजनांच्या माध्यमातून करत आहोत. स्त्री जन्मदर वाढला, त्यांचे   शिक्षण, पोषण झाले, आता त्यांचे आणि सबलीकरण होणे आवश्यक आहे आणि हेच माझे ध्येय आहे असे त्या म्हणाल्या. महिलांना सशक्त करण्यासाठी आम्ही बचतगटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सशक्त करण्याचे काम करत आहोत. महिलांच्या कर्तृत्वाचा सूर्य उगवण्यास आता सुरुवात झाली आहे, कोंबडा आरवला नाही म्हणून सूर्य उगवायचा थांबणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 
खासदार डाॅ प्रितमताई मुंडे 
ना. पंकजाताई मुंडे यांनी परळी व जिल्हयात भौतिक विकासाबरोबरच सामाजिक चळवळही चांगल्या प्रकारे राबविली. महिलांना बळकटी देण्यासाठी  अनेक योजना त्यांनी प्रभावीपणे अंमलात आणल्या, महिला सशक्तीकरणाला एक नवी उंची यामुळे मिळाली त्यामुळे त्यांना आगामी काळात महिलांनी भक्कमपणे साथ द्यावी असे आवाहन खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी आपल्या भाषणात केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. शालिनी कराड यांनी केले तर बालविकास प्रकल्प अधिकारी हुंडेकरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते  बेबी केअर किटचे वाटप, माझी कन्या भाग्यश्री योजनेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, जनजागृती करणा-या पत्रकारांचा सन्मान तसेच शालेय परिक्षेतील गुणवंत विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.